Wednesday, April 23, 2014

पंतप्रधान कालचे व उद्याचे....नक्कीच महत्वाचे

पंतप्रधान कालचे व उद्याचे....नक्कीच महत्वाचे

सध्या सगळीकडे निवडणूक व पंतप्रधान कोण होणार याची चर्चा चालू आहे. देश प्रगतिपथावर ठेवण्यात पंतप्रधान महत्वाची भूमिका बजावतात. त्यांची व्हिजन महत्वाची असते. भारताला स्वातंत्र्य मिळाले. नवीन देशाची घडी बसवताना किती अवघड गोष्टींना तोंड द्यावे लागले हे आपण इतिहासात बघतोच. आपण जर गेल्या ५०-६० वर्षाचा कालखंड पाहिला तर    प्रत्येक पंतप्रधानाने कारकिर्दीत एखादा तरी महत्वाचा निर्णय घेतला आहे. सुरूवातीला विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिल्याने पुढे त्याचे काय परिणाम झाले ते आपण आपल्या आयुष्यात बघू शकतो. तेव्हा आणि आता असा तुलनात्मक विचारही करू शकतो. कुणालाही हे पद मिळाल्यावर आरामात सत्ता उपभोगता आलेली नाही.

सुरूवातीला सगळ्या संस्थानांना एकत्र आणणे हे मोठे काम होते. आज आपण परत स्वतंत्र तेलंगणा आणि इतर काही स्वतंत्र राज्यांच्या मागण्या बघतो. आजचे नेते व पूर्वीचे राज्यकर्ते बघताना त्या काळात शिकलेली मंडळी खूप भाग घेत होती असे दिसते. बरेचसे वँरिस्टर झालेले लोक, आंदोलनात भाग घेतलेले लोक काम करत होते. आजही काही चांगली शिकलेली मंडळी आहेत पण कमी शिकलेली, क्रिमिनल चार्जेस वाली ही खूप दिसतात.

पंडित जवाहरलाल नेहरू ... पहिले पंतप्रधान. ब्रिटीश देश सोडून जाताना सगळ्या गोष्टी खिळखिळ्या करून गेले होते. विज्ञानाशिवाय प्रगति नाही हे पंडित नेहरूंनी ताडले होते. त्यासाठी देशात आय आय टी ची स्थापना त्यांनी केली. खरगपूर येथील एका जेल मध्ये पहिल्या आय आय टी ची स्थापना झाली.आज देशात १६ आय आय टी आहेत आणि आपण सगळे जाणतोच की या तंत्रज्ञांना जगात किती मान मिळतो ते. देशाला परकीय वित्त मिळवून देण्यात यांचा मोठा भाग आहे. अणू उर्जा प्रकल्प त्यांनीच चालू केला. डाॅ होमी भाभा यांचा फार मोठा हातभार या प्रकल्पात होता. नेहरूंनी अजून एक महत्वाचे केलेले काम म्हणजे भाक्रा नानगल प्रकल्प. देशातील सर्वात मोठे व जगातले दोन नंबरचे हे धरण. काही राज्यातील पिकपाण्याची मोठी समस्या दूर झाली हे आपण आजही बघतो.

लाल बहादूर शास्त्री ... फक्त १८ महिने शास्त्रीजी पंतप्रधानपदावर होते.  तेव्हा देशात धान्याची मोठी समस्या होती. भूकबळी जात होते. अमेरिकेकडून गहू आयात केला जात होता. हा गहू विशेष चांगल्या प्रतिचा नव्हता. जय जवान जय किसान हा नारा देउन हरीत क्रांति ची सुरवात करण्याचे श्रेय शास्त्रीजींना जाते. त्यांनी राहत्या घरी धान्य पिकवले. आठवड्यातून एक दिवस  उपास करण्याचा संदेश दिला आणि आपल्या मुलांनाही तो करायला लावला. देशात वर्षाला दोन पिके घेणे, धान्याचे प्रदर्शन खेड्यात करणे असे करून शेतकरी वर्गाला गोष्टी पटवून दिल्या. डॅा स्वामिनाथन यांनी या हरीत क्रांति च्या कामात मोठे योगदान दिले. आणंद येथे सहकारी तत्त्वावर दूध उत्पादक संघाचे काम कसे चालते याचा शास्त्रीजींनी  अभ्यास केला व वर्गिस कुरीअन यांच्या सहाय्याने अमूल --आनंद मिल्क युनिअन  ची स्थापना केली. १९६५ - १९७० डेअरी डेव्हलपमेंट ---अॅापरेशन फ्लड नावाने झाली. या सगळ्यामुळे देशातील- खेड्यातील रोजगार वाढला. आज आपण सगळे बघतोच आहोत की देश सध्या अन्नधान्याच्या बाबतीत, डेअरी उत्पादनात किती समृद्ध आहे ते.

इंदिरा गांधी.... या जेव्हा पंतप्रधानपदावर आल्या तेव्हा पूर्व पाकिस्तानात स्थिती गंभीर होती.  लाखो निर्वासितांचे लोंढे बिहार, त्रिपुरा, प बंगाल अासाम येथे य़ेत होते. देशाची आर्थिक स्थिती वाईट होती. मुजीबूर रहमान मुक्तिवाहिनी ची आघाडी सांभाळत होते. अशा वेळेस जनरल के माणेकशा यांच्या सहाय्याने दिलेला लढा केवळ धाडसी निर्णय होता. नौसेने ने यावेळेस बंगालची खाडी संभाळली तसेच प पाकिस्तान चे हल्ले परतवले. केवळ १६ दिवसात जनरल नियाजी नी सरेंडर केले. अमेरिकन युद्धनौका पोचायच्या आत बांगला देश अस्तित्वात आणणे सोपे नव्हते. त्यांनी असेच अनेक निर्णय घेउन देशाला प्रगति पथावर नेले पण १९७५ ला लावलेल्या इमर्जन्सी मुळे त्या निवडणूक हरल्या. ४२ वी घटना दुरूस्ती महागात पडली.

मोरारजी देसाई..... यांनी ४३-४४ वी घटना दुरूस्ती करून मूलभूत अधिकार परत दिले. परत इमर्जन्सी लावणे अवघड करून टाकले. राष्ट्रपती ना सगळे निर्णय लेखी स्वरूपात सादर करणे गरजेचे केले व कोर्ट सक्तीचे केले. या वेळेस तयार झालेली जनता पार्र्टी ही इंदिरा गांधीच्या विरोधातील होती त्या नेत्यात फूट पडली व परत इंदिरा गांधी निवडून आल्या.

राजीव गांधी.....सूचना प्रसार मंत्रालयात हवामान खात्याचे अंदाज वर्तवण्यासाठी कॅाम्प्युटरची गरज पडत असे. हे तंत्रज्ञान अमेरिकेने भारताला दिले होते. जेव्हा अजून चांगल्या कॅाम्प्युटरची आवश्यकता होती तेव्हा अमेरिकेने मदत करण्यास नकार दिला. त्या वेळेस विजय़ भटकर यांच्या सहाय्याने सी डॅक ची स्थापना झाली व ३ वर्षात भारताने आपला परम हा सुपर संगणक बनवला. अमेरिकेना जेव्हा मदत नाकारली तेव्हा  असाच भारताचा फायदा झालेला आहे. संगणक हा रोजगार काढून घेइल म्हणून खूप विरोध राजीव गांधींना सहन करावा लागला. लोकांनी हरताळ केले. हा सगळा विरोध बाजूला ठेवून राजीव गांधींनी संगणक क्षेत्र पुढे नेले याला कारण त्यांची व्हिजन. आज आपण बघतोच आहोत की भारत या क्षेत्रात अग्रेसर आहे आणि मोठ्या प्रमाणात रोजगार देत आहे. १९८४ मध्ये बी पी ओ टेलिकॅाम टेक्नॅालॅाजी खेडोपाडी पोचवण्याचे श्रेय त्यांनाच जाते. शहाबानो केस सारखे महत्वाचे खटले त्याच्याच काळात झाले आणि श्रीलंके चे युद्धातही चांगले काम केले. त्यांनी केलेली ५२ वी घटना दुरूस्ता मात्र कित्येक लोकांना पटली नाही.  त्यावेळी संसद सदस्य सतत पार्टी बदलत असत. हे थांबवण्या साठी ही घटनादुरूस्ती केली गेली. पार्टी च्या निरोधात मत देणे अगर पार्टी बदलणे म्हणजे सदस्यत्व गमावणे. जर पार्टी ने तुम्हाला काढले तर मात्र सदस्यत्व रहाते. या नंतर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्याने नवीन पंतप्रधान आले.

व्ही पी सिंग.... त्यांचे महत्वाचे योगदान म्हणजे मंडल आयोग. २७ टक्के जागा अन्य मागास लोकांना मिळाल्या. या निर्णयावर खूप दंगे झाले. पण निदान आज खूप ठिकाणी मागास वर्गातील तोकांना राजकारणात यायची संधी मिळाली व त्यांनी चांगले कामही करून दाखवले.

चंद्रशेखर ... कुवेत वॅार मुळे तेलाचे भाव भडकलेले होते. कर्ज वाढलेले आणि परकीय चलन संपत आलेले. त्या नेळेस सोने गहाण ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

पी व्ही नरसिंहराव....१९९१..आर्थिक स्थिती सुधारण्याची मोठ्या प्रमाणात गरज होती. त्यासाठी अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी आर्थिक उदारीकरण केले. यापूर्वी सरकारचा कंट्रोल सगळ्या गोष्टींवर होता तो कमी करून विदेशी कंपन्यांना बिजिनेस साठी परवानगी दिली. या गोष्टीच आपल्या आर्थिक राजकारणावर झालेला परिणाम आपण बघतच आहोत.

देवी गौडा.. यांच्या राज्यातही हे धोरण चालू राहिले. १९९६ मध्ये पी चिदंबरम यांनी उद्योगावरच्या टॅक्स चा सरचार्ज काढला व टॅक्स दर कमी केला.१०य२०य३० या ब्रॅकेट मध्ये टॅक्स बसवला व ड्रीम बजेट सादर केले त्याना लोकांचा फायदा झाला व अजूनही ते चालू आहे.

अटल बिहारी बाजपेयी....यानंतर ेका पार्टीचे सरकार बनणे अवघड झाले. पहिले नॅान कॅांग्रेस ५ वर्षे चाललेले सरकार होते. दिल्ली मुंबई कलकत्त्ा व चेन्नई हायवे ने जोडणारा प्रकल्प त्यांनी सुरू केला तो २०१२ मध्ये पूर्ण झाला. यासाठी सरकारी पैसा कमी होता म्हणून फंड गोळा केले गेले. १९९५ मध्ये टिलिकॅाम पॅालिसी बनवून स्वस्त मोबाईल्स चा जमाना सुरू झाला. यासाठी ड्यूटी कमी केली व आॅपरेटर्स मधील स्पर्धा वाढवली.

मनमोहनसिंग.... यांच्या राज्यात २००५ मध्ये आर टी आय अॅक्ट झाला. सरकार काय करते, टॅक्स कुठे जातो हे साधारण लोकांपर्यंत पोचू लागले.अण्णा हजारे, केजरीवाल यांचे त्यात महत्वाचे योगदान आहे. २००४ मध्ये ६ ते १४ वर्ष वयाच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला.

आता परत कोलगेट, २ जी घोटाळे चर्चेत आहेत. आता या पुढे कोणते सरकार येणार व काय महत्वाचे निर्णय घेणार ते बघायचे. आपल्या मागच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयामुळे देश प्रगती करत राहिला हे नक्की.
अमेरिकेने जेव्हा काही बंदी आणली किंवा मदत बंद केली तेव्हा चांगला मार्ग काढला आहे. उदा. संगणक निर्मिती, उत्तम प्रतीचा गहू, उदारीकरण ज्याचा देशाला फायदाच झाला आहे. आता त्ांनी मदत नाकारायची वाट न बघते आपणच नवीन वाटा शोधायला हव्यात.

पहिले पाउल  हे नेहेमीच महत्वाचे व अवघड असते. वर उल्लेखलेली पहिली पावले आपल्या आजपर्यंतच्या पंतप्रधानांनी टाकली त्याबद्दल आपण त्यांचे थोडेतरी ऋणी रहोयला हवे.