Friday, August 19, 2011

मला बसलेले सांगितीक धक्के.....

मला बसलेले सांगितीक धक्के....

मला कर्नाटकी संगीत विषेश आवडत नाही. (कमी ऐकलेले आणि कळत नाही हे खरे) . जास्त हिंदुस्थानी ऐकलेले. राग संगीत हे आपले वाटते. हे राग गुरू शिष्य परंपरेतून पुढे आले हेही माहीत होते. अगदी सामवेदापासून गायनाचा उल्लेख केलेला आढळतो. काही वर्षापूर्वी एक लेक्चर ऐकले...संगीताच्या इतिहासावर आणि त्याच्या वाटचालीवर तेव्हा कळले की हिंदुस्तानी पेक्षा कर्नाटक संगीत जास्त ओरिजिनल आहे. त्यात कमी बदल झालेत. हिंदुस्तानी संगीतावर मुस्लीम व पर्शिअन प्रभाव जास्त आहे. त्यातल्या त्यात ध्रुपद धमार वाले परंपरा जपत आहेत. पण ध्रुपद पेक्षा लोकांना आता ख्याल बंदिशी जास्त आवडू लागल्या.

आपल्यकडे गुरू शिष्य परंपरेने गाणे शिकवले जाते. नोटेशन पूर्वी करत नसत. जेव्हा हिंदुस्थानावर आक्रमणे झाली आणि मुगलांचे राज्य आले तेव्हा राजा म्हणेल ती दिशा या न्यायाने गाणे बदलत गेले, अरबी, फारसी इराणी यांचा प्रभाव पडला आणि आपले गाणे डिमांड नुसार बदलले. चांगली गोष्ट एवढीच की ते टिकले लयाला गेले नाही. जेव्हा कला टिकवायला लोकांकडे पैसे नसतात तेव्हा तडजोड करावी लागतेच. या तडजोडी पायी एवढे बदल करावे लागले हे माहीत नव्हते. का कुणास ठाउक मुस्लीमांच्या दयेवर या कला पुढे टिकल्या हे जरी खरे असले तरी त्यातला झालेला बदल धक्कादायक होता.

आपल््यापैकी बहुतेकांना नाट्यसंगीत मनापासून आवडते. त्याला शास्त्रीय संगीताचा पाया असतो. गाणारे पण चांगले होते.
शब्द चांगले असत. परवा बालगंधर्व सिनेमाचा एक प्रोमो पाहिला आणि मला दुसरा धक्का बसला. खाली दिलेली लिंक याचे स्पष्टीकरण देईल. बरीच नाट्यगीते जुन्या बंदिशीवर आधारित आहेत. आठवणीतली गाणी या लिंकवर नाटके या सदरात काही गाण्यांच्या खाली उल्लेख आहे. यातून झाला तर पुढील पिढीचा फायदाच झाला आहे पण मला का कुणास ठाउक ही गाणी अगदी ओरिजिनल वाटत. काही बंदिशीवर आधारित होता हे माहित होते पण एवढ्या प्रमाणात...जरा पचवायला अवघडच गेले. http://www.youtube.com/watch?v=nCU6PfOqMbA&NR=1

ही लिंक पहा...

आता त्या काळी शास्त्रीय संगीताला जेव्हा वाईट दिवस आले होते तेव्हा ते वाचवण्याकरता बंदिशींचा आधार घेतला गेला असे म्हणतात. त्यामुळे शास्त्रीय संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचले पण आणि आणि टिकले पण.

हे सगळे जरी खरे असले तरीसुद्धा जेव्हा अगदी सही न सही चाल काँपी होते (कुठल्याही भाषेतली) तेव्हा वाईच वाटतेच. आपण नवीन पिढीतल्या काही संगीतकारांना म्हणतो अरे काय चाली चोरतात ...सेम गाणी काँपी करतात म्हणून. आता तुम्ही म्हणाल ती गाणी अगदी फालतू असतात त्याला शास्त्रीय पाया नसतो तरी प्रकार तोच ना......

मराठी लिखाणात पण हा प्रकार खूप आढळतो... त्याबद्दल परत कधीतरी..........